अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठी लवकरच कार्यवाही होणार

वेगवान मराठी
मुंबई, दि. 29 : जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठीची कार्यवाही सुरू असून लवकरच शेतक-यांना मदत मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
८ ते ११ एप्रिल या दरम्यान राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानापोटी भरपाई मिळावी, अशी लक्षवेधी सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली होती.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यात केवळ ८ ते ११ एप्रिल २०२४ याच कालावधीत पडलेला अवकाळी पाऊस नाही, तर जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत पडलेल्या पावसाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी या भागातील पंचनामे करावेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिका-यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे या भागात २ लाख ९१ हजार४३३ हेक्टर क्षेत्रात पंचनामे प्राप्त झाले आहेत. त्याच्यामध्ये ३ लाख २३ हजार २१९ शेतकरी आहेत.४९५ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत.या नुकसानासाठी मदतीच्या निकषापेक्षा जास्त देण्यात यावी यासाठी जुलैपर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होईल, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
